अगं आहेस कुठे? सकाळपासून फोन करतेय तुला, नॉट रिचेबल सांगतायत. मी मेसेज सुद्धा पाठवला होता व्हाट्सपवर तोही बघितला नाहीस?, ऋजुताची वहिनी एकदम हवालदिल होऊन विचारत होती.
हो हो काय झालं एवढं? रात्री एअरप्लेन मोडवर टाकते ना फोन, आज सकाळी नेमका काढायचा राहिला. मी नाही बघत सकाळी उठल्या उठल्या व्हाट्सप, नको ते फॉरवर्ड असतात उगाच. अन् नेमकं सकाळी नको ते डोळ्यासमोर येतं.
पण तुला कसली एवढी इमर्जन्सी आली?, ऋजुताला वहिनीचं वागणं कळेचना.
अगं आम्ही उद्या येतोय ना तुझ्याकडे. अचानक ठरलं आमचं. तुझ्या दादाला तुला फार भेटावसं वाटतय. सुट्टी पण आलीये ना जोडून. वहिनीने एका दमात सगळं सांगितलं.
तसं ऋजुताला हसायलाच आलं आणि ती म्हणाली, मग या की!! फोन न करता आलात तर मी काय घेणार नाही का घरात? काय रे देवाss
तसं नाही. म्हटलं तुला कळवावं आधी. म्हणून फोन करत होते. वहिनी दबक्या आवाजात म्हणाली.
मला सरप्राईज आवडलं असतं वहिनी………
पण तू कुठं गेली असतीस तर आम्हाला सरप्राईज मिळालं असत ना ऋजुता? तुमचा काही प्लॅन असता तर दुसरा?
ते ऐकून मोठा श्वास सोडून ऋजुता म्हणाली, वहिनी हल्ली किती विचार करायला लागलोय ना आपण कोणाकडे जाण्याआधी? अगदी आपल्या शहरातच कुणाकडे जाताना पण फोन करून जावं का? आत्ता यावेळी गेलं तर चालेल का? मग ते घरातच असतील का पासून ते पन्नास प्रश्न डोक्यातून काढतो आपण. अन् मग फक्त विचारच करत बसतो जायचा. जाणं होतच नाही. कित्येकाना भेटवासं वाटत असतं, पण भेटणं होतच नाही.
अगदी खरंय बघ तुझं. आपल्या लहानपणी सगळे कसे ना धडक मोहीम करायचे!! पोस्टकार्ड पाठवून कळवलं तर कळवलं. ते सुद्धा बरेचदा माणूस येऊन गेल्यावर मिळायचं. पण बरेचदा कळवण्याबिळवण्याच्या भानगडीत कोणी पडायचंच नाही. मनात आलं की सुटायचे. येऊ का बिऊ का काही नव्हतंच!!, वहिनीही बोलता बोलता भूतकाळात शिरली.
बघ. तूच हे सांगतीयेस म्हणून बरं. आणि आता तूच मला कळवायला उतावीळ झाली होतीस. माझी आवडती माणसं अगदी कोणत्याही वेळेला कधीही माझ्याकडे आली, न सांगता आली तर माझं तोंड वाकडं होणार आहे का?, ऋजुताने वहिनीलाच उलट प्रश्न केला.
त्यावर वहिनी नाराजीच्या सुरात म्हणाली, तसं नाही ग. हल्ली माणसं स्वतःहूनच म्हणतात. फोन करून या तेवढं. ते इतकं आता अंगवळणी पडलंय ना, की अगदी आमच्याच गावात मैत्रिणीकडे, नातेवाईकांकडे जाताना पण एक फोन होतोच. हा फोन नव्हता ना तेव्हा असं काही विचारायला लागायचंच नाही. हो की नाही?
ऋजुता फोनवरच नकळत मान डोलावून म्हणाली, हो ना. आजी-आजोबा आम्हाला घेऊन किती फिरायचे सगळ्यांकडे, विचार दादाला. दर शनिवार रविवारी जवळच्या नातेवाईकांकडे, ओळखीच्यांकडे चक्कर असायचीच. आणि थोडी मोठी सुट्टी आली की लांबच्या नातेवाईकांकडे फेरी ठरलेली असायची. सगळ्यांच्या भेटी व्हायच्या प्रत्यक्षात. पण कोणी न कळवता आलात म्हणून रागावलेलं आठवत नाही मला कधी!! आठवतोय तो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आम्हाला बघून फुललेला आनंदच. अन् आता मात्र कुणाकडे जायचं म्हटलं की ते घरी असतील का? हा पहिला प्रश्नच वाट अडवतो आपली. सारखं कोण कुठं जातं असतं घरी नसायला?
वहिनीच्या डोळ्यासमोर झपकन् एक जूनी आठवण ताजी होऊन आली, तशी मनातून ती एकदम खूष झाली आणि म्हणाली, तुला सांगू ऋजुता? एकदा ना मला सुट्टीत मामाकडे जायचं होतं. अकरावीची परीक्षा नुकतीच झालेली माझी. आईबाबांना नंतर सुट्टी मिळणार होती. मला झालेली घाई. त्यावेळी सगळं तसं सुरक्षित वातावरण होतं.
मी एकटीनेच जायचं ठरवलं. कळवायला वेळच नव्हता. मामाकडे आणि आमच्याकडे फोनही नव्हता. मी ठरवलं तसं निघाले, आईबाबांनी गाडीत बसवून दिलं. सहा- सात तासाच्या प्रवासानंतर संध्याकाळी पोचले. तर स्टँडवर समोरच मला आजोबा दिसले. स्टॅण्ड घरापासून खूप जास्त लांब होतं. बसने जाण्याएवढं. मी त्यांना हाक मारून त्यांच्याजवळ गेले. इकडं कुठं आलात विचारलं, तर ते म्हटले आलो फिरत फिरत.
मग त्यांच्याबरोबर घरी निघाले तर ते म्हटले, अगं आज आपल्या घरी नाही, आम्ही सगळे नलावडयांकडे आलोय. त्यांनी नवीन घर
घेतलं ना. त्याची पूजा होती. रात्री जेऊनच घरी जायचय सगळ्यांना.
नलावडे माझ्या मामाचे जवळचे मित्र होते.
मग मी देखील आजोबांबरोबर त्यांच्याकडे गेले. पण सगळ्यांना राहून राहून आश्चर्य वाटत होतं, पूजेला आलेले आजोबा मधेच उठून स्टँडवर गेलेच कसे? नलावड्यांच्या घरापासून तर स्टॅण्ड आणखी जास्त लांब होतं. पत्र नाही फोन नाही तरीही आपलं माणूस आलंय हे कुणी कळवलं त्यांना?
अन् जर ते नसते आले तर मी काय केलं असतं, रात्रीपर्यंत? घराला कुलूप बघून माझ्या मनात काय आलं असतं? लहानच होते मी तशी. बाजूच्यांकडे गेले असते पण खूप ताटकळले असते नक्कीच.
पण त्या माझ्या अचानक तिथे जाण्याने जन्मभर न विसरू शकणारा अनुभव मला मिळाला. आजीने तर मला कितीतरी वेळ उराशी कवटाळून ठेवलं होतं.
आजही ते सगळं डोळ्यासमोर आलं की मन खूप सुखावून जातं. ती आपली माणसं जवळ नसली तरी अगदी खूप खूप जवळ असल्याच्या भास होतो. आता फोनच्या जमान्यात कुणाला असे अनोखे क्षण गवसत असतील ग?
खरंच वहिनी……
आपल्याला वाटतं अवचित जाऊन आपण समोरच्याचा खोळंबा करणार, पण काही अद्भुत अनुभवही मिळू शकतो, ह्याचा विचारच करत नाही आपण. मनाला अडचणीच उभ्या करायची सवय लावली आपण, त्यामुळे चांगलं काही सुचतच नाही पटकन. फेरी फुकट जाईल याची काळजी जरा जास्तच करतो हल्ली आपण.
पण ती पूर्वीची धडक मोहीम वेगळाच आनंद देणारी होती नक्कीच…….!!
असो…….
आता यावरून एवढं बोललोय तर आपणच सुरू करूया तसं पुन्हा!! बघूया काय मिळतात अनुभव. जे येतील ते मनाची तयारी ठेवायची. पण आता येऊ का जाऊ का करणं सोडून द्यायचं. आणि मनात आलं की सुटायचं. जास्त विचार न करता. काय म्हणतेस? ऋजुताने असं विचारताच तिची वहिनी उत्साहाने म्हणाली, चालतय की. एकमेकींना सांगत बसू नवनवीन अनुभव. सरप्राईज देऊ नाहीतर स्वतःच सरप्राईज होऊ, पण आपल्या माणसांसाठी फोनची फॉर्मलीटी सोडून देऊ आणि पूर्वीसारखा माणसांना खुल्या मनाने भेटण्याचा निर्भेळ आनंद घेऊ………
ऋजुताने ‘नक्कीच’ म्हणत फोन ठेवला.
तो ठेवताच मनात मात्र दादा वहिनी येऊन गेल्यावर सर्वात आधी कोणाच्या घरी धडक मोहीम टाकायची, ह्याची योजना आखणं नकळतच सुरू झालं. अन् कित्येक महिने भेटू भेटू म्हणून राहिलेल्यांची नावं समोर येताच चेहऱ्यावर छानसं हसूही पसरू लागलं……….
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज “हल्ला गुल्ला” नक्की लाईक आणि फॉलो करा.