प्रांजल रेखाताईंची लाडकी सून. लाडकी म्हणजे इतकी लाडकी की ती बोलली आणि यांनी ते केलंच.
पचायला जरी जड वाटत असलं, तरी हे अगदी खरं बरं का!!
सिद्धार्थ आणि प्रांजलच लग्न होऊन दोन वर्ष झाली.
आणि यांच्या घरात एकदाही सासू सुनेत कुरबुरही नाही झाली. भांड्याला भांडं लागलच नाही कधी.
आणि याला कारणीभूत फक्त सासूबाईच!!
स्वभावाने अतिशय गरीब. कुठलीही गोष्ट जास्त खेचणं स्वभावातच नाही.
पहिल्यापासूनच त्यांनी ठरवलेलं सून ही सून नसणारच, माझी मुलगीच असेल ती.
पण ठरवलेल्या गोष्टीही माणसं स्वतःच्या सोयीनुसार बदलतात.
आपल्या रेखाताई काही त्यातल्या नव्हत्या!!
आता या अशा, तर त्यांची सून कशी असेल बरं?
त्यांची सून प्रांजल, आईवडिलांची एकुलती एक.
लाडात वाढलेली. थोडीशी बालिश आणि हट्टीही!!
सर्व स्वतःच्या तालानुसार झालं तर बाईसाहेब खूष.
नाहीतर नवऱ्याच्या मागे गाणं गुणगुणत (actually भुणभुणत) बसणार.
नवराही स्वभावाने आईवरच गेलेला, मग काय प्रांजलच राज्य.
आता सासूबाईंनी मुलगीच मानलं म्हटल्यावर हिची तर चैनच होती.
कुठल्याही कामाची सक्ती तिच्यावर नव्हती. केले तर कधी तिच्या मर्जीने ती एकदोन पदार्थ करायची. पण मुडवर डिपेंड सगळं. रेखाताई होत्याच. आणि इतर कामाला बाई देखील होती.
प्रांजलला त्यांनी मनापासून आपली मानली होती, पण तिने मात्र त्यांच्याकडे नेहमी सासुबाई म्हणूनच पाहिलं.
असो….
पुढच्या काही दिवसात प्रांजलकडे गोड बातमी आली, तेव्हा तर रेखाताईंना काय काय करू आणि काय काय नको असं झालं.
अंगात नवी उमेद, उत्साह संचारला.
त्या प्रांजलला आणखीनच जपायला लागल्या.
आई जे जे करेल ते सारं तिच्यासाठी करू लागल्या.
आणि प्रांजल मात्र बसता उठता आss ऊss करून स्वतःचे अति लाड पुरवून घ्यायला लागली.
ते काही असतात ना समोरचा करणारा भेटला, की त्याच्या डोक्यावर बसणारे, त्यातलीच तीही!!
रोज एकेक नवीन नखरे असायचे तिचे, हे नको ते पाहिजे, हे जात नाही, याचा वास सहन होत नाही.
नोकरीलाही पहिले दोन महिने रजा टाकून दिली होती तिने.
रेखाताई होत्याच तालावर नाचायला घरी.
त्या सहन करायच्या म्हणून हे सगळं वाढलेलं. नाहीतर नॉर्मल केसला एवढं कुणी झेलणं विरळाच.
मान्य, बाळंतपणात हे सगळं होतं, पण प्रत्येक माणसाकडे काही सहनशक्ती असतेच की!!
हिचा तोरा मी गरोदर राहून तुमच्यावर मोठे उपकार करतीये असा !!
बऱ्याचदा जेवणासाठीही ती आपल्या खोलीतून बाहेर यायची नाही. रेखाताईच तिला हातात ताट आणून द्यायच्या. आणि ही तोंड वाकडं करत करत खायची.
कसं असतं बघा, इथे सासू चांगली तर सून नखरेल, बऱ्याच ठिकाणी सासू जहांबाज असते, तिथे सून गरीब गाय असते. (असं म्हणतात 😜)
हा ताळमेळ किती ठिकाणी साधला जात असेल, कुणास ठाऊक??
पण काहीही म्हणा प्रांजलने बाकी नशीबच काढलं होतं म्हणायचं. नवरा तर असतो हो बरेच वेळा पण सासूही हो ला हो करणारी मिळाली म्हणजे सोने पे सुहागाच की!!
एवढं सगळं असूनही प्रांजलला रेखाताईंनी पहिल्या बाळंतपणसाठी सुद्धा आईकडे पाठवलं नाही,किंवा प्रांजलनेही हट्ट धरला नाही. कशाला धरेल नाही, सगळं आयतं हातात मिळत असल्यावर??
तिचे सर्व चोचले पुरवून त्यांनी तिचं बाळंतपण सुखरुप निभावून नेलं.
माहीत नसणारे तर रेखाताईंनाच तिची आई समजत.
रेखाताईंनाही मनोमन खूप बरं वाटे. त्यांच्या खऱ्या प्रेमाची पावतीच जणू ती!!
लहान बाळाला देखील रेखाताईंचाच जास्त
लळा लागला. कारण प्रांजलपेक्षाही त्यांनीच त्याचं सर्व केलेलं.
सहा महिन्यानंतर प्रांजल नोकरीला जाऊ लागली. आणि मग बाळाची पूर्ण जवाबदारी रेखाताईंवरच पडली. प्रांजल बिनधास्त होती, कारण आपल्या सासूला ती चांगलीच ओळखून होती.
तिचं सर्व लाईफ एका मुलाची आई होऊन सुद्धा पहिल्यासारखच सुरू झालं, आणि इकडे रेखाताईच्या अंगावर मात्र दुसऱ्यांदा आईपण पडलं. एक तरुण वयात आणि दुसरं म्हातारवयात.
पण त्या सर्व खूप प्रेमाने करायच्या. लहान मुलांच्या पाठीमागे धावणं, त्यांच्यावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणं, खाणं पिणं बघणं आणि त्यांची आजारपणं काढणं सोप्प थोडंच असतं??
पण अशा अनेक रेखाताई सासूच्या, आईच्या किंवा आणखी कोणाच्या रुपात ते सर्व निभावून नेत असतात. म्हणूनच मुली, सुना आपली नोकरी करत यशाची शिखरं गाठत असतात.
रेखाताईंसारख्या तर काही अपेक्षाही करत नाहीत कसली, त्यांना फक्त द्यायचं माहिती असतं, आणि प्रांजल सारख्यांना फक्त घ्यायचं!!
पण चला, आज या निमित्ताने रेखाताईंसारख्या साऱ्याजणींसाठी कृतज्ञता व्यक्त करूया, ज्या आपल्या पाठीशी आपला भरभक्कम आधार बनून उभ्या असतात. ज्यांच्या जीवावर निश्चिंतपणे घर सोडून आपण आपले छंद, आवड, नोकरी, करियर या सर्वांना पुरेसा वेळ देऊन प्रगतीच्या वाटेवर धावत असतो.
सांगा कोण आहे तुमच्यामागे असं??