सौरभ बारावीनंतर पुढच्या शिक्षणासाठी आपल्या मोठ्या बहिणीकडे शहरात आला. किंबहुना बहिणीनेच आई-वडिलांच्या मागे लागून त्याला त्याच्या पुढच्या करियरसाठी आपल्याकडे बोलावून घेतले. सौरभ मूळचा हुशार होताच, उत्तम रित्या त्याने शिक्षण पूर्ण केले आणि एका चांगल्या कंपनीत नोकरीही लागला.
हे सर्व ताईमुळे झाले, यासाठी तो ताईचा जवळजवळ प्रत्येक शब्द झेलायचा. ती म्हणजे त्याच्यासाठी देवच जणू. लग्न सुद्धा त्याने अगदी ताईने निवडलेल्या मुलीबरोबरच केले. कोणत्याही प्रकारे त्याला ताईला दुखवायचे नव्हतेच.
तेजादेखील अगदी त्याच्या एवढी उच्चशिक्षित नसली तरी पदवीधारक होती. दिसायला गोड आणि लाघवी. स्वभावाने शांतच खरंतर.
सौरभ लग्नानंतरही ताईकडेच रहात होता. ताईनेही कधी जा म्हटले नाही आणि त्याच्या मनात कधी तिथून निघण्याचा विचारही आला नाही. तो ताईच्या संसारात चांगलाच रुळला होता.
तेजा पसंती ताईची असली तरी, ती लग्न करून घरी आल्यावर ताईमध्ये आपोआप वर्चस्वाची भावना येऊ लागली.
सौरभ जसा आपल्या ताब्यात आहे, तशीच तेजाही असावी, तेजानेही आपल्या आज्ञेत राहावे असं तिला वाटू लागलं.
तेजाला नोकरी करायची परवानगी नव्हती, घरातलं सगळं काम तिच्या माथ्यावर मारण्यात आलं. नवीन नवीन तेजालाही हौस वाटली. पण नंतर मात्र जाच वाटू लागला. प्रत्येक कामावर ताईसाहेब नजर ठेऊन असायच्या. हे असंच कर, ते तसंच लागत. आमच्या ठरवलेल्या पद्धतीनेच सगळं झालं पाहिजे, यावर जास्तच कटाक्ष असायचा. जेवण करताना तिच्या मागे उभं राहून तिला अगदी गांगरून टाकायच्या, प्रत्येक कामात खोट काढायच्या ताईसाहेब!
नणंदबाईंच्या अंगात सासूबाई शिरल्या होत्या.
तेजाला आता हे सारं सहन होईना झालं, सौरभला सांगायची सोय नाही, तो दुर्लक्ष करायचा, जे आहे तसं तुला ऍडजस्ट करावं लागेल असंच बोलायचा.
तेजा गोड होती, तरी सौरभने केवळ भोगायला मिळालेली स्त्री म्हणूनच तिच्याकडे पाहिले, बायको म्हणून नाहीच. तिला प्रेम माया कधी दिली नाहीच. जे सारं प्रेम होतं, ते बहिणीसाठीच होतं फक्त. बहीण देव, ती करेल ते पूर्व.
या सगळ्यातही दोन वर्षे काढली तेजाने, पण नंतर तिला अगदी नकोसं झालं. तिची नुसती कुचंबणा होत होती. ती सौरभच्या खूप मागे लागली, आपण इथून दुसरीकडे जाऊया, आपला नवीन संसार सुरू करूया. किती दिवस इथे राहणार? पण सौरभ काही ऐकेचना.
शेवटी तेजाने स्वतःच्या घरी फोन करून सारे सांगितले आणि मी घरी निघून येते म्हणूनही सांगितले.
आई-वडिलांनी पाठिंबा दर्शविला. आणि तिने नंणंदेला आणि सौरभला एक शेवटचा प्रयत्न म्हणून सांगितले, की मला इथे राहायचं नाही, आम्ही वेगळं राहणार असू तरच मी सौरभ बरोबर राहीन.
सौरभच्या ताईने अर्थातच कांगावा सुरू केला. तेजाला नाही नाही ते बोलायला सुरुवात केली, आणि उगाच नको बाबा माझ्यामुळे तुमचा संसार तुटायला, म्हणून सौरभला तिथून निघायला सांगितले.
तरीसुद्धा सौरभने टंगळमंगळ करत आणखी सहा महिने घालवले. त्यात तो आता तेजावर सारखा आरडा ओरडा करू लागला. पण तेजा वेगळं राहिल्यावर सारं ठिक होईल म्हणून सहन करत राहिली.
अखेर ते वेगळे झाले. पण सौरभने देखील त्यातल्या त्यात बहिणीच्या भागातच आपल्यासाठी घर बघितले होते. त्यामुळे ताईसाहेब चांगल्याच टच मध्ये होत्या.
घरात नव्हत्या, पण स्वतःच्या घरात बसून भावाच्या घरचा रिमोट हातात ठेऊन होत्या.
वेगळं राहून सुख येईल असं वाटलेलं तेजाला, पण तोही एक भ्रमच ठरला. त्यात तेजाला दिवसही राहिले. पण त्या दिवसांत नवरा जे लाडकोड करतो ते काही तेजाच्या नशिबात नव्हते.
तो सतत तिच्यावर डाफरायचा फक्त. माझ्या बहिणीपासून तोडलस म्हणून दूषणं देत राहायचा.
छोट्या छोट्या गोष्टीतून त्याचं डोकं फिरायचं आणि सुरू व्हायची तेजावर शिव्यांची खैरात!
तेजाला वाटलं, बाळ आल्यावर सुधारेल. पण नाहीच, बाळ आल्यावर सुद्धा सौरभ अगदी तसाच राहिला. तेजात आणि त्याच्यात प्रेमबंध कधी जुळलेच नाहीत.
तेजाच्या नणंदेला सर्व माहीत होतं, पण एक स्त्री असून देखील स्वतःच्या अहंपणापायी दुसऱ्या स्त्रीचं दुःख तिने कळून घेतलच नाही.
तेजाला वाटायचं ताई बोलल्या सौरभशी, त्यांनी समजावलं तर सारं ठिक होईल. पण ताई आगीत तेल ओतत होत्या. समजावणं तर दूरच राहीलं.
सौरभ बाबा म्हणून बाळाशी छान नातं टिकवून होता. पण बाबा म्हणून बाळाला वाढवण्यात आईला काहीएक मदत करत नव्हता. सगळं फक्त तेजाच करत होती. काही सांगितलं तरी तो करायचा तर नाहीच, पण उगाच भांडण मात्र उकरून काढायचा.
आता नवीन म्हणजे तेजाला उकसवायला त्याने अर्वाच्य शिव्या देणं सुरू केलं होतं. फालतू कारणावरून डोकं फिरवून घेऊन तो तिच्यावर हात ही उगारू लागला होता.
कारण काय तर मला बहिणीपासून तोडलं.
तेजाच्या घरचे समजवायला आले तर त्यांनाही तो अपमानीत करून पाठवून द्यायचा.
एकदा तर हद्दच झाली, आणि अशाच कुठल्या कारणावरून भांडताना त्याचा तोल सुटला, त्याने तेजाच्या आईला काही कारण नसताना अतिशय अर्वाच्य भाषेत घाणेरडी शिवी घातली.
तेजा अवाक् झाली, आपल्या भांडणात माझ्या घरच्यांना आणायचं कारणच काय, आणि त्यातून माझ्या आईला शिवी द्यायचं कारण? उच्चशिक्षित ना हे? कशाला घेतलं मग एवढं शिक्षण. अशिक्षित लोक पण एकवेळ असल्या शिव्या देताना विचार करतील? आणि हे शिक्षित?
तिला या सगळ्याची घृणा वाटली अगदी, डोळ्यात तर पूर आलेला. जवळ कोणीच नाही. होता नव्हता तो सारा संयम सुटला. तिने घरी फोन केला, आणि सर्व सांगितलं, घरचे तिचा आधार बनायला तयार होते. तसही एवढं सहन करत आपल्या मुलीने राहू नये हेच त्यांच मत होतं.
तिने तिच्या नणंदेला बोलावून सर्व सांगितलं. माझ्या आईवरून घाणेरडी शिवी दिलीये; तुमच्या उच्चशिक्षित भावाने, आता मी नाही राहणार इथे, खूप सोडलं माझं स्वत्व मी, आता नाही! माझ्या घरच्यांचा अपमान तोही इतक्या खालच्या पातळीवर जाऊन आणि काही कारण नसताना हे मी सहन करूच शकत नाही.
ताई, तुमच्या हातात होतं, सावरणं पण तुम्ही पुढाकार घेतला नाहीत, भावाला शिक्षण दिलत, पण सभ्यता शिकवली नाहीत. लग्न झाल्यावरही तुमचा भाऊ तुमच्या हातात हवा होता तुम्हाला, म्हणूनच माझ्यासारखी साधी मुलगी शोधलीत. माझ्या संसारचं वाटोळं तुम्ही केलंत, एक स्त्री असूनही.
खरंच स्त्रीच स्त्रीची शत्रू असते, हे ऐकलं होतं, पण आज पटलं.
हिच शिवी मी घातली असती तर, मला जिवंत ठेवलं असतं का तुमच्या भावाने?
माझा पाय माझ्या बाळासाठी अडकत होता, त्याला का पारखं करू बापाच्या प्रेमाला असं वाटायचं मला. नवरा बायकोच्या भांडणात निष्पाप पोरं मात्र भरडली जातात.
असो, जो निर्णय आधीच घायला हवा होता, तो आता मात्र मी घेतलाय, स्वतःचा आत्मसन्मान आणखी घालवून नाही राहू शकत मी इथे. तुमच्यापासून दूर जाणं, तुमच्या भावाच्या जिव्हारी लागलंय, घ्या आता त्याला, ठेवा कायमचं तुमच्या घरात, पण माझ्यासारख्या दुसऱ्या कुणाचं आयुष्य नासवायचे उपकार करू नका.
तुमचा भाऊ संसार करण्याच्या लायकीचा नाही. आणि तुम्ही स्त्री म्हणून घ्यायच्या.
सोडली तमा मी आता या असल्या मोडक्या संसाराची!
तेजाच्या बोलण्याचा कितपत असर पडला माहीत नाही, कारण काही माणसं कितीही काही केलं तरी सुधारत नाहीच. तिला कोणी अडवलंही नाही, उशिरा का होईना ती पडली घराबाहेर मोकळा श्वास घायला!
अगदी खरं घडलेलं आहे हे, नात्यातली माणसंच नात्यांमध्ये विष कालवतात. इथे ही कथेतली तेजा निघालीये बाहेर, पण खरी तेजा अजूनही विचारच करतीये, बाळाचा, इच्छा खूप आहे तिची सारं सोडून बाहेर पडायची कारण आता खरंच गळ्यापर्यंत आलय सगळं. नणंदबाईला तर आपण चुकलोय याची जाणीवच नाहीये आणि नवऱ्याला तेजाची फिकिरच नाही.
खूप सहन केलंय तेजाने, पण मन का कोण जाणे अजूनही कचरतय तिचं निर्णय पक्का करायला, जाचातून सुटून मुक्त उडायला बळ हवंय तिला, द्यायचं का आपण साऱ्यांनी मिळून?
तुमच्या कमेंट्स खऱ्या तेजाला योग्य पाऊल उचलण्यासाठी प्रवृत्त करतील अशी अपेक्षा आहे.
© स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
लेख आवडल्यास लाईक, कमेन्ट, फॉलो नक्की करा आणि शेअर करताना मात्र नावाचा मान राखायची तेवढी काळजी घ्या.😊
Same as me ani me sudha ata teja sarkhach disijan ghetlay
Good decision.. I also did that. Never give chance anyone to spoiled your life. Even if he is loved one..
I did not take a chance for baby because my husband and in-laws were exactly like this guy's sister. Shevti me gharat paisa denar nahi sangitlyawar navrach achanak palun gela majhe sarva dagine ani paisa gheun. Majha career pan barbaad karaycha changlach prayatna tyane kela but my boss and colleagues supported me. Also my family is with me. Teja needs to step out of the house with all her belongings and never return.
Even I took the same decision… ND staying with my mom ND my daughter.. ☺️
very good decision!