एका छोट्याश्या गल्लीत तिचं पोळीभाजी केंद्र होतं. गल्लीत होतं तरी कुठून कुठून लोकं ती गल्ली शोधत यायचे. तशी तिथल्या तिथे पाच पाच मिनिटाच्या अंतरावर आणखी चार- पाच पोळी भाजी केंद्र होती, आणि संपूर्ण विभागात तर तशी कित्येक होती.
पण सर्वात जोरदार फक्त चालायचं तिचंच. तिचं म्हणजे मिथिलाचं. हा, आता बाकीच्यांना वाटायचं, लोकं येतात ते तिला पाहायला, लोकांना भाजीपोळीपेक्षा तिच्यात जास्त इंटरेस्ट असतो. पण त्यात तथ्य नव्हतंच. ती जरी सुंदर दिसत असली तरी, ना तिला कुणाकडे बघायला वेळ असायचा, ना कोणालाही तिला. एवढी गर्दी असायची तिच्याकडे. एका माणसाला जास्तीत जास्त एक-दोन मिनिटं पार्सल घेईपर्यंतच थांबता यायचं.
तिच्याकडे सगळ्या वयोगटातले पुरुष यायचे. पण स्त्रियांची संख्या त्याहून जास्त होती.
तिच्या हातचा कुठलाही पदार्थ त्यांना त्यांच्या आईची आठवण करून दयायचा. सुगरण होती ती. आणि जरी पोळीभाजी केंद्र चालवत होती, तरी तिथल्या एकेक पदार्थात स्वतःचा जीव ओतायची ती. गिऱ्हाईकाची लाईन बघून भाजी वाढवण्यासाठी त्यात पाणी घालून, मूळ चवीला ती कधीच धक्का पोचवायची नाही. सगळा माल उत्तम वापरायची ती. मदतीला चार बायका होत्या, पण सगळी मापं तिच द्यायची त्यांना. भाज्यांची सगळी तयारी हाताखालच्या बायका करायच्या, पण फोडणीला द्यायची हिच. हिची भाजी म्हणजे बोटं चाटायला लावणारी. जरा वेगळी चव वाटली की लोकं सरळ फोन करायची आणि म्हणायची, ताई भाजी तुमच्या हातची नाही वाटतं. आम्ही तुमच्या हातच्या चवीसाठी येतो ओ……..
नोकरीला जाणाऱ्या बायकांना तर तिचं केंद्र म्हणजे मोठा आधार वाटायचा. उशीर झाला यायला, कंटाळा आला की नुसता भात लावला तरी चालायचं. भाजी-भाकरी किंवा पोळी-भाजी हवं ते तिच्याकडून आणता यायचं. बाहेरचं मागवून सुद्धा घरचंच खाल्ल्यासारखं वाटायचं. घरचेही कोणी किरकिर करायचे नाहीत. बऱ्याच बायकांनी तर रात्री तिच्याकडून भाजी आणायचं रोजचंच करून टाकलं होतं. थोडे पैसे जायचे, पण त्यांनाही मोकळीक आणि आराम मिळायचा.
मिथिला शिकलेली होती. ग्रॅज्युएट होती चांगली. काही काळ नोकरीही केली होती तिने. पण तिला कुणाच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतः स्वतःच्या उत्कर्षासाठी काही करावं असं पहिल्यापासून वाटायचं. जे श्रम आपण दुसऱ्यासाठी घेणार तेवढेच किंवा त्याहून अधिकही स्वतःसाठी का घेऊ नये असं तिचं मत होतं.
लग्नानंतर तर तिने नोकरी न करता स्वतःचं काहीतरी सुरू करायचा निर्णय घेतला. सुरुवातीला तीन चार वेगवेगळे बिझनेस केले. पण कशातच तिला यश मिळालं नाही. ड्रेस विकले, साड्या विकल्या, मोत्यांचे दागिने विकले, पार्लर चालवलं, इतकंच काय तर लग्नही जुळवून बघितली. पण तिचा जम कुठेच बसला नाही. प्रयत्न तर मनापासून केले होते तिने, पण यश हाती आलंच नाही. होते तेवढे स्वतःकडचे पैसे घातले तिने, नवऱ्यानेही खूपदा दिले, पण नंतर मात्र तोही वैतागला. एक दिवस तिला बोललाच, कशाला एवढ्या उचापात्या करतेस, मी कमावतोय ना चांगलं. मिळत तर काही नाहीये, नुसती घालवतेस मात्र. कसलं खुळ डोक्यात भरलय बिझनेसच देव जाणे!! गप खा की बसून, कोणी सांगितलंय जीव जाळायला??
नवरा प्रेम करणारा होता, तिच्या तालाने नाचला ही होता एवढे दिवस. पण नंतर मात्र तिच्या सततच्या अपयशापुढे तोच हरला. त्राग्याने मग तोंडातून नको ते बाहेर पडलं.
पण तिच्यातलं ते खुळ, असं तसं जाणाऱ्यातलं नव्हतं. एवढ्या तेव्हढ्याने उमेद हरणारी नव्हतीच ती. तिला यशस्वी बिझनेस करून दाखवायचाच होत़ा.
इतरांपेक्षा स्वतःलाच!! कारण तिचं एक मन तिला सारखं भीतीने मागे खेचत होतं. एवढं ट्राय केलं, कुठे काय झालं, बास खूप झालं. आणखी अपयश नको. त्या मनाचं तोंड तिला कायमसाठी बंद करायचं होतं.
असाच एकदा नवरा कामावरून आला आणि म्हणाला, भाजी जरा जास्त देत जा ग. माझ्या ऑफिसमध्ये सर्वांना खूप आवडतात तुझ्या भाज्या.
कितीदा सांगितलंय मी तुला?
तो हे बोलला, आणि क्षणात तिला क्लिक झालं. तिने पटकन नवऱ्याला विचारलं, मी पोळी-भाजी केंद्र काढू का रे?
तो जोरात ओरडलाच तिच्यावर, स्वतःला समजतेस काय तू? भाज्या चांगल्या असतात म्हटलं तर लगेच त्याचा धंदा सुरू करायला निघालीस? अजून तुझं मन भरत नाही का?
दोन लोकांची भाजी बनवणं वेगळं, आणि शंभर लोकांची वेगळं. माझ्याकडे आता अजिबात पैसे नाहीत तुझे नसते चोचले पुरवायला.
मिथिलाचे डोळे भरून आले, तरी ती म्हणाली, मी जमवेन सगळं. नवऱ्याने उडवून लावलं, तरी तिच्या मनाने ते धरलंच. आणि खरोखर पैशापासून सगळं तिनेच जमवलं. नवऱ्याने हात वर केले, तसे तिने तिचे सगळे दागिने गहाण ठेऊन पैसे जमवले. त्यांच्याच विभागात छोटीशी जागा भाड्याने घेतली. एक बाई मदतनिस म्हणून ठेवली. सुरुवातीला फक्त भाजी पोळी एवढंच सुरू केलं.
पहिले ट्रायलला म्हणून येणारं प्रत्येक गिऱ्हाईक तिच्या भाजीच्या चवीने केंद्राशी कायमचं बांधलं गेलं.
सुरुवातीला सकाळी दोन भाज्या आणि रात्री दोन भाज्याच ठेवल्या होत्या तिने, पण त्याही अगदी दोन तासातच संपायला लागल्या, पहिल्यापासूनच. जणू काही सगळेच तिच्या पोळीभाजी केंद्राची वाट बघत होते. त्यांना हवी होती तशी चव हिच्याकडे मिळाली, आणि तिथून आतापर्यंत हुलकावणी देणाऱ्या यशाने मिथिलाकडे झेप घ्यायला सुरुवात केली.
नावं ठेवणारा नवरा स्वतःची नोकरी संभाळून संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत पैशाचा व्यवहार बघायला केंद्रावर यायला लागला. तिच्या वाढदिवसाला तिचे गहाण ठेवलेले दागिने स्वतःहून सोडवून दिले त्याने. जागा कमी पडायला लागली म्हणून बाजूचा मोठा गाळा सुरुवातीला भाड्याने मग विकतच घेऊन टाकला दोघांनी मिळून. नवरा वाईट नव्हताच. फक्त त्याचा तिच्यावर तिच्याइतका विश्वास नव्हता.
शेवटी एकदाचा मिथिलाच्या मनाप्रमाणे बिझिनेस सुरू झाला. हळूहळू एकेक पदार्थ वाढवत नेला तिने. पण डोईजड होईल एवढं काही ठेवलं नाही. तिचं पाहून आजूबाजूला आणखी बरीच नवी पोळीभाजी केंद्र आली, पण हिच्यापुढे कोणाचा टिकाव लागला नाही. तिच्यासारखं क्वालिटी आणि कष्टातलं सातत्य सर्वांनाच राखता यायला हवं ना!!
मिथिलाच्या यशाची चढती कमान बघून, पुढे दोन वर्षांनी तर तिचा नवरा आपली नोकरी सोडून पूर्ण वेळ तिला मदत करायला पुढे आला. त्यालाही पटलं, दुसऱ्यासाठी राबण्यापेक्षा स्वतःच्या उत्कर्षासाठी थोडं जास्त राबणं केव्हाही चांगलंच!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज “हल्ला गुल्ला” नक्की लाईक आणि फॉलो करा.
✔️👍
Sudarshanvalekar222.blogspot.com